मटा ऑनलाइन वृत्त: गेल्या पाच वर्षांत परराज्यांतून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्यांच्या यादीत उत्तर प्रदेशी आणि बिहारींची संख्या सर्वाधिक असल्याची आकडेवारी खुद्द राज्य सरकारनंच आज विधिमंडळात सादर केली आहे. त्यामुळे मनसेचं, राज ठाकरेंचं परप्रांतियांविरोधातलं आंदोलन अकारण नव्हतं, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालंय.
गेल्या पाच वर्षात एकूण १२ लाख ३९ हजार लोक परराज्यातून महाराष्ट्रात आलेत. त्यापैकी उत्तर प्रदेशातून आलेल्या ‘ भय्यां ’ ची संख्या आहे, ४ लाख २३ हजार. तर, ५१ हजार बिहारींनी राज्यात ठाण मांडलंय. २००८-०९ या आर्थिक वर्षातील सर्वेक्षण अहवाल सरकारनं विधानसभेत मांडला आणि त्यातूनच हा धक्कादायक ‘आकडा ’ निघालाय. म्हणजेच, नोकरी-व्यवसायासाठी महाराष्ट्रात आलेल्या या ‘भय्यां ’ चं आपण स्वागत आणि आदरातिथ्य केल्याचं सरकारनं स्वतःच मान्य केलंय.
राज ठाकरेंनी मराठीचा ‘ आवाज ’ दिल्यानंतर राज्यात परप्रांतियांचा मुद्दा चांगलाच पेटला. भूमिपुत्रांना डावलून उत्तर प्रदेशी आणि बिहारींचं प्रस्थ महाराष्ट्रात वाढत चालल्याचं त्यांनी आक्रमकतेनं मांडलं आणि मराठी तरूणांच्या सहनशीलतेचा स्फोट झाला. त्यामुळे राज्यातल्या राड्यासाठी राज्य सरकारनं राज ठाकरेंना दोषी धरलं आणि त्यांच्या अटकेपर्यंत मोठं नाट्य रंगलं. पण, आज सरकारनंच राज यांचा मुद्दा खरा ठरवला आहे.
इतर राज्यांचा विचार केला तर, कर्नाटकातून १.३५ लाख, गुजरातमधून १.१९ लाख, राजस्थानातून ८२ हजार, केरळमधून ४१ हजार आणि आंध्र प्रदेशातून ३२ हजार लोक गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात आले. पण, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्या उत्तर प्रदेशातून आणि अविकसित बिहारमधून तब्बल ५ लाख जण नोकरीच्या शोधार्थ महाराष्ट्रात आलेत.
तसंच, शहरं बकाल होण्यामध्येही या परप्रांतियांचाच मोठा वाटा आहे. कारण एकूण १२ लाखांपैकी १० लाख ७४ हजार लोक राज्याच्या शहरी भागात मुक्काम करून आहेत. इतकंच नव्हे तर, राज्याच्या ग्रामीण भागातूनही २२.६२ लाख नागरिक शहरांमध्ये आल्याचं आकडेवारी सांगते. त्यामुळे ‘ गावाकडे चला ’ आणि ‘ स्व-राज्यात चला ’ असे नारे देण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झालेय.
नोकरी- व्यवसायाच्या निमित्तानं महाराष्ट्रात येणा-यांची संख्या सर्वाधिक, ५.६४ लाख आहे. पण त्यासोबतच, पालकांचं मुलांसोबत येणं (३.८५ लाख), लग्न (२.०२ लाख) आणि शिक्षण (५१ हजार) ही सुद्धा स्थलांतराची प्रमुख कारणं आहेत.